पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
कर्ज माफी झाली तरच शेतकरी सुखी होईल. त्यामुळे शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. सारथी योजनेला, अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाढीव निधी मिळावा. लाडकी बहीण योजना, एसटी बस सवलत योजना राबवून महिला सुखी होणार नाहीत. त्यांचा विकास होणार नाही तर त्यांचा शास्वत विकास करण्याचा प्रयत्न गरजेचे आहे. त्याचबरोबर महिलांचे संरक्षण व्हायला हवे. अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी स्वराज्य संघटना प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य संग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केले.
पंढरपूर येथे स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की, राज्य सरकारने सुरू केलेल्या सारथी योजनेचा फायदा तरुणांना झाला आहे. हे फडणवीस यांचे काम महत्त्वपूर्ण आहे. मात्र, सारथीची व्याप्ती वाढवावी, अशी मागणी आहे. भ्रष्टाचार थांबला पाहिजे. देश भष्टाचारमुक्त झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे. रायगडावरील जगदिश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. कंत्राटी नोकरभरती थांबवावी तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून नव उद्योजकांसाठी कर्ज पुरवठा केला जात आहे. हे चांगले आहे. मात्र या महामंडळाला अधिकचा निधी मिळावा.
नियम अटी शिथिल कराव्यात. कारण सरकारी बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे कर्जदाराला सहकारी बँकांचा आधार घ्यावा लागत आहे. लाखो उद्योजक तयार केले, असे शासन म्हणते. मात्र, प्रत्यक्षात किती कर्ज दिले हे सांगावे. मराठा तरुणांना अडवणूक न करता थेट कर्जपुरवठा करावा अशी मागणी आहे. सरकार सहजासहजी देत नाही. त्यांच्याकडून भांडून घ्यावे लागते, हेच आपणाला करायचे आहे. जो पक्ष या देशाचा, धर्माचा, विकासाचा विचार करेल, त्या पक्षाला सहकार्य करू, असे शिंदे यांनी सांगीतले. याप्रसंगी विक्रांत भांब्रे, अनंत देशमुख, अजित बानगुडे, उदय आंमोनकर, शरद किणीकर, कमलाकर जाधव, जालिंदर लांडे आदींसह राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.