पंढरपूर : आजचे जग ज्ञानावर सुरू आहे. विकास हा ज्ञानातून होतो. ज्ञान हीच शक्ती आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे. जग हे संशोधनावर श्रीमंत झाले आहे. ज्ञान नसेल तर तंत्रज्ञानात पुढे जाता येणार नाही. जगात पुढे जायचे असेल तर नावीन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या संस्थेच्या स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत, विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण तसेच मुलींचे नऊ मजली नूतन वसतिगृह पायाभरणी सोहळा मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. समाधान आवताडे, आ. अभिजित पाटील, आ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे, सचिव सूरज रोंगे, डॉ.अनिकेत देशमुख, जि. प माजी सदस्य वसंतनाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, जगातले सर्वोत्तम ज्ञान भारतात होते. नालंदा, तक्षशिला जगातील पहिली विद्यापीठे होती. आपल्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची पूर्तता करायची असेल तर सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण संस्थातून निर्मित होणे गरजेचे आहे. नाविन्यपूर्ण संशोधनासाठी शिक्षण संस्थेबरोबर शासन बांधील राहिल. राज्यात 842 कोर्सेस ना मुलींना फी माफ केलेली आहे. मुलींच्या वसतीगृहाशिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही. सुरक्षित वसतिगृहे आवश्यक आहे. मुलींच्या वस्ती गृहाला पर्याय नाही. कमवा व शिका या योजनेतेर्गत राज्यातील 5 लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे उद्दिष्ट आहे. यावर शासन काम करत आहे. मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास त्या खूप शिकतील, असेही पाटील यांनी सांगितले.
500 हून अधिक विद्यार्थी विकसित देशात नोकरीस
स्वेरीच्या पहिल्या वर्षी रुपाली पवार ही विद्यार्थिनी शिवाजी विद्यापीठामध्ये गोल्ड मेडल मिळवून पहिली आली होती. ती परंपरा अद्याप चालू आहे. संस्थेचे प्लेसमेंटच्या माध्यमातून 500 हून अधिक विद्यार्थी विकसित देशात नोकरी करीत आहेत. प्रवेश आणि कॅम्पस एवढेच नाही, तर संशोधन करण्यालाही प्राधान्य दिलेले आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन यांनी 33 कोटी 73 लाख रुपये चा दोन वर्षाच्या रिसर्च प्रोजेक्ट मंजूर केला असल्याचे स्वेरी संस्थेचे संस्थापक डॉ. बी. पी. रोगे यांनी सांगितले.
देशाची पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि चांगल्या सुविधा देण्यासाठी स्वेरीने नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. स्वेरीमुळे गोरगरिबांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय झाली आहे. विद्यार्थी घडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या कार्याला राज्यशासन नेहमी सहकार्य करेल.- जयकुमार गोरे, पालकमंत्री