सांगोला : पुढारी वृत्तसेवा
तुळजापूरहून भवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परतताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कार पाठीमागून माल ट्रकला जोरात धडकली. त्या भीषण अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील दोघेजण जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे हा अपघात घडला. या अपघातात सुखदेव बामणे (वय 40) व नैनेश कोरे (31, दोघेही रा. नांदणी) मृत्युमुखी पडले. अनिल शिवानंद कोरे (42, रा. नांदणी), सुधीर चौगुले (35, रा. वडगाव), सूरज विभुते (21, रा. कोथळी) हे तिघे गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवरात्रीनिमित्त गेले होते देवीच्या दर्शनाला कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी कारमधून (एमएच 09 एफबी 3908) नवरात्रीनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. दर्शनानंतर सोलापूरहून ते नांदणीकडे निघाले होते. वाटेत सांगोलानजीक चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारने डाळिंब घेऊन जाणार्या 16 चाकी (एमपी 20 झेडएम 9518) मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात दोघेजण मृत्युमुखी पडले.अपघातानंतर महामार्ग पोलिस पथक व सांगोला पोलिस स्टेशनकडील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला काढून जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.