सोलापूर : आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांच्या सेवासुविधेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण करण्यासाठी लातूर, सातारा आणि सांगली येथील गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील अधिकारी वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. त्यांना मतदार यादी विशेष पुनरीक्षणाच्या कामातून तात्पुरती सूट दिली आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध विभागातील अधिकाऱ्यांना सेवा कार्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच अन्य संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पंढरपूर आषाढी वारीसाठी सेवा वर्ग करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांवर पालखी मार्गावरील सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि वारकऱ्यांच्या सोयींचे नियोजन व देखरेखीची जबाबदारी आहे. वारीतील सेवा कार्य पूर्ण होताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या मूळ निवडणूक कामकाजावर रुजू व्हावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर येथील आषाढी वारीचे नियोजन आणि निवडणूक आयोगाचे काम या दोन्ही बाबींमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे.