सोलापूर : आषाढी यात्रा-२०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पालखी मार्गावरील सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पंढरपूर, मोहोळ, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी आणि उत्तर सोलापूर या सात तालुक्यांतील पालखी तळांवर इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. आषाढी वारीदरम्यान या केंद्रांचे कामकाज प्रभावीपणे पार पाडण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या आहेत.
यासाठी अपर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटरच्या नियोजनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. आषाढी वारी कालावधीत नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी सर्व यंत्रणांनी २४ तास अलर्ट मोडवर राहून कार्य करावे, अशा सूचनाही अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पूरस्थिती, अपघात, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय मदत, अग्निशमन यासारख्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत. या आढावा बैठकीस जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, पुरवठा निरीक्षक तसेच महसूल, पोलिस, आरोग्य, महावितरण व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.