पंढरपूर : राज्यात महायुती सरकार सक्षम आहे. त्यामुळे महायुतीतून आऊट गोईंग कोठेही होत नाही. ज्याला त्याला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे प्रत्येकजण संधी शोधत असतो. परंतु, महायुतीमधून आऊटगोईंग होत नाही. आज महायुतीला 180 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. विद्यमान आमदारांच्या मदतीने येणार्या निवडणुकीत याहीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीमधील जागा वाटप लवकरच होईल, ज्येष्ठ नेते ते जाहीर करतील, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. ही योजना फसवी असल्याने पैसे बंद होणार, असा अपप्रचार विरोधकांकडून होत आहे. तो चुकीचा आहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकात इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा उल्लेख केला नाही. परंतु, जीआरमध्ये लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला यश मिळत आहे. त्याचा विरोधकांना त्रास होत आहे.
महायुतीचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, महिलांसाठी सक्षम आहे. जेथे महिलांवर अन्याय होईल, तेथे राज्याचा गृह विभाग सक्षम कारवाई करत आहे. यासाठी केंद्रानेही कायद्यातील जुनी कलमे बदलली आहेत. शक्ती कायद्याचाही वापर करण्यात येत आहे. 25 टक्के त्रुटी दुरुस्ती करून शक्तीकायदा प्रभावीपणे अमलात आणला जाणार असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.