सोलापूर : मागील तीन महिन्यांपासून निवडणूक कार्यक्रम सुरू असून, सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्या आहेत. या ड्युटीला दांडी मारणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नगरपलिका, महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. फेबु्रवारी महिन्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामांचा ताण वाढला आहे. निवडणूक प्रक्रियेत कर्तव्ये पार न पाडता गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासन कारणे दाखवा नोटिसा बजावून समाधानकारक उत्तर न दिल्यास वेतन कपातीसह फौजदारी कारवाईसुद्धा होऊ शकते.
अनेक कर्मचारी वशिला लावून प्राथमिक कारणांमध्ये आई, पत्नी अथवा कुटुंबातील सदस्य आजारी असल्याची कारणे नमूद करुन इलेक्शन ड्युटी रद्द करुन घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे प्रशासनानेही अधिकृत कागदपत्रांशिवाय इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेऊ नये, अशी मागणीही होत आहे. प्रशासनाने वैद्यकीय व इतर अत्यावश्यक कारणांमुळे काही कर्मचाऱ्यांना आधीच निवडणूक कर्तव्यातून सूट दिली होती. परंतु अनेकजण याबाबत वरिष्ठांच्याकरवी इलेक्शन ड्युटी रद्द करुन घेत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
निवडणूक प्रक्रिया ही प्रत्येक शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्याची संविधानिक व कायदेशीर जबाबदारी आहे. या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.