सोलापूर : माता व बालमृत्यू दर रोखून ती शून्यावर आणण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारकडून सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत.
यानिमित्त याच मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ५९८ गरोदर महिलांची तपासणी केली असता यात ९४ महिला या अति जोखमीच्या (हाय रिस्क ) गरोदरपणात असल्याचे निदान झाले आहे. आरोग्य विभागाकडून या महिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यांना मोफत उपचार व मार्गदर्शनही दिले जात आहे. गरोदरपणात तीव्र रक्तक्षय, उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड व एचआयव्ही यांसारखे आजार माता आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकतात.
शासनाच्या या उपक्रमामुळे अति जोखीम (हाय रिस्क) मध्ये असलेल्या गरोदर महिलांवर तज्ज्ञांकडून वैयक्तिक देखरेख ठेवली जात असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभाग आता या महिलांच्या नियमित पाठपुराव्यावर भर देत आहे.
गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतः ची योग्य काळजी घ्यावी. सुरक्षित प्रसुतीसाठी गरोदर महिलेच्या नागरिकांनी नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व या मोफत सुविधांचा लाभ आणि सकस आहार घ्यावा.- डॉ. आशा घोडके, स्त्रीरोग तज्ज्ञ नवजात शिशु व महिला रुग्णालय