सोलापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 68 गटातून 945 तर 136 गणातून 1659 अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी गुरुवारी (दि. 22) पूर्ण झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गट, गण वगळून इतर दहा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 53 तर पंचायत समितीचे 92 अर्ज अपात्र ठरले आहेत.
जिल्हा परिषद गट, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी पूर्ण झाली असून 68 गट आणि 136 गणातून एकूण 145 अर्ज बाद झाल्याची समोर आली आहे. अर्ज बाद होण्यामागे अपूर्ण कागदपत्रे, प्रस्तावकअनुमोदकातील त्रुटी, शपथपत्रातील चुका, जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे, तसेच विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याची कारणे समोर आली आहेत. दरम्यान, गुरुवारी अर्जाची छाननी पूर्ण झाली असून, एकूण दक्षिण सोलापूर तालुकातील गट, गण वगळता इतर दहा तालुक्यातील जवळपास 791 जिल्हा परिषदेचे तर 1404 अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारपर्यंत अर्ज घेता येणार मागे
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाची गुरुवारी (दि.22) अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.23) पासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, मंगळवारपर्यंत (दि.27) उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे.