सोलापूर : नमो शेतकरी महासन्मान निधीं योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी 1932.72 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यात सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शेतकर्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील शेतकर्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा दिला आहे. नमोच्या हप्त्याची राज्यातील 94 लाख तर सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 99 हजार 345 हजार शेतकरी प्रतिक्षा करत होते. तसेच योजना बंद झाली, या अफवेने जोर धरला होता. त्यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता मात्र राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शेतकर्यांना नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नमो किसान ईकेवायसी झाल्यास लाभ
कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या आकडेवारीच्या आधारे राज्य शासनाकडे सातव्या हप्त्यासाठी निधीची मागणी केली होती. या निधीमधून पात्र लाभार्थ्यांव्यतिरिक्त, ज्या शेतकर्यांची पीएफएमएस नोंदणी प्रलंबित आहे किंवा ज्यांचे आधार कार्ड बँक खात्यातून वगळले गेले आहे, त्यांनाही लाभ दिला जाणार आहे आहे. सोलापूर जिल्ह्यात पीएम किसानचे 5 लाख 2 हजार 625 लाभार्थी असून, यातील 4 लाख 99 हजार 345 लाभार्थ्यांनाच 20 वा हप्ता मिळाला होता. 5 हजार 319 शेतकर्यांची ईकेवायसी प्रलंबित हेते. आता नमो किसान शेतकर्यांची ईकेवायसी झाली असल्यास सूमारे 100 कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
आधार लिंक, ई-केवायसी हवी
योजनेतील शेतकर्यांना आधार लिंक करणे व ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सातवा हप्ता एप्रिल ते जुलै कालावधीतील
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत शेतकर्यांना वार्षिक 6,000 रुपये मिळतात. त्यामध्ये भर घालून राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेद्वारे स्वतंत्रपणे वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. सध्या मंजूर झालेला सातवा हप्ता हा एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीसाठी आहे.प्रक्रिया न करणार्या खातेदारांचा लाभ थांबविण्यात आलेला आहे.