मंगळवेढा : दिवाणी व फौजदारी न्यायालय, मंगळवेढा येथे शनिवारी (दि.14) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल 315 प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून 1 कोटी 51 लाख 28 हजार 848 रुपयांची वसुली करण्यात आली.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार ही लोकअदालत आयोजित करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शर्मा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी. पी. पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दिवाणी न्यायाधीश वृषाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतीत कौटुंबिक वाद, मालमत्ता तंटे, आर्थिक व्यवहार, बँक कर्ज वसुली, कामगार वाद तसेच समेट करण्यायोग्य फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी घेऊन तडजोडीने तोडगे काढण्यात आले. लोकअदालतीसाठी दोन पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. पॅनल क्रमांक एकमध्ये न्यायाधीश व्ही. के. पाटील आणि विधीज्ञ पी. बी. बुरकूल यांनी कामकाज पाहिले. तर पॅनल क्रमांक दोनमध्ये न्यायाधीश एम. एस. माळी यांनी सुनावणी केली.
लोकअदालत यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. आर. आय. शेख, उपाध्यक्ष एम. डी. गायकवाड, ॲड. एम. डी. मर्दा, ॲड. डी. एस. माने, ॲड. जे. डी. मुल्ला, ॲड. आर. एस. कोळेकर, ॲड. पी. एल. पवार, ॲड. प्रतिक बुरकुल, ॲड. सौरभ मोरे यांनी सहकार्य केले. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक अधीक्षक आर. एम. किलजे, विधीसेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.