सोलापूर : गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास २४ म्हशींचा मृत्यू झाला आहे . हा धक्कादायक प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या म्हशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता ग्रामस्थांतून केली जात आहे.
गुळवंची येथील शेतकरी हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या २४ म्हशी गुरुवारी नेहमीप्रमाणे चरण्यासाठी बाहेर पडल्या . यादरम्यान त्या गावातच असलेल्या ओढ्यात विजेची तार तुटून पडली होती. त्यामुळे पूर्ण पाण्यात विजेचा करंट उतरला होता. या पाण्यात या २४ म्हशी उतरल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. याची कल्पना भजनावळे यांना नव्हती. ही बाब लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या. हे लक्षात येतात भजनावळे यांनी उर्वरित चार म्हशींना त्या पाण्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे चार म्हशीचा बचावल्या. या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती मधून या संबंधित पशुपालक शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे.