पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांसमोर घोणस अळी नावाच्या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळत आहे. बीड पाठोपाठ सांगली जिल्ह्यात या अळीचा प्रादुर्भाव पाहावयास मिळाल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेतकर्यांनी काळजी घेणे हाच सध्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
शेतकर्यांसमोर सातत्याने नवनवीन संकट येत आहेत. कधी नैसर्गिक संकट तर कधी सरकारी धोरण हे कायम चालूच आहे. अशातच आता शेतकर्यांसमोर घोणस अळी नावाच्या अळीचे नवे संकट उभे राहिले आहे. या घोणस अळीचा परिणाम केवळ पिकावरच नाही तर माणसांवर देखील होताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील अंबक (ता.कडेगाव) येथे 20 वर्षांची तरुणी घोणस अळीच्या संपर्कात आल्याने तिला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली आहे.
दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. या वातावरणातील बदलांचा परिणाम शेतकर्यांच्या पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारच्या कीडी पडत आहेत. मात्र, घोणस नावाची एक अळी जी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ही अळी म्हणजे कोणत्याही पिकावरील किड नाही तर एक रानटी गवतावरील अळी आहे. शेतकर्यांनी शेतात काम करताना काळजी म्हणून अळीपासून संरक्षण करण्यासाठी फुल कपडे घालणे गरजेचे आहे. तसेच ही अळी शरीरावर येऊ नये याची शेतकर्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.