कण्हेर ; पुढारी वृत्तसेवा : कण्हेर, ता. सातारा येथील धरणावर अनेक वर्षांपासून मोटारींसह केबल वायर चोरणार्या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. शनिवारी रात्री युवा शेतकर्यांनी रात्रगस्तवेळी चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कण्हेर धरणात कण्हेरसह जांभळेवाडी येथील सुमारे 18 शेतकर्यांनी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी मोटारी बसवून वीज कनेक्शनही जोडलेली आहेत. सध्या धरणाने तळ गाठल्याने पात्रातील बहुतांश भाग उघडा पडल्याने अनेकांच्या मोटारीही उघड्या पडलेल्या आहेत. दर उन्हाळ्यात अनेक शेतकर्यांच्या मोटारी व केबल वायरींची चोरी केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीही शिवनाथ बामणे, बबन साबळे व विकास वाघमळे या तीन शेतकर्यांच्या सुमारे 800 फूट लांबीच्या केबल वायरी चोरीला गेल्या. यामुळे युवा शेतकर्यांनी स्वतः रात्रगस्त देऊन केबल वायर चोरी करणार्यांचा छडा लावण्याचे आव्हान स्वीकारले. त्यात त्यांना यश आले. शनिवारी रात्री त्यांना दोघे चोरटे केबल वायरची चोरी करताना सापडले. या घटनेची माहिती सातारा पोलिसांना देऊन चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
वारंवार होणार्या मोटारी व केबल चोरीमुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आले आहेत. याबाबत अनेकदा तक्रार करून देखील पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकर्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सतत होणार्या चोर्यांमुळे पोलिसांच्या रात्रगसतीचा मुद्दा कळीचा बनला आहे. पोलिसांनी संबंधित घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपासाची चक्रे गतिमान करावी व चोरट्यांना धडा शिकवावा, अशी मागणी या परिसरातील शेतकर्यांमधून केली जात आहे. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
चोर्यांमुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान
कण्हेर धरण व वेण्णा नदी पात्रातून पाणी पुरवठ्याची योजना करून बागायती शेतीस पाणी पुरवले जाते. संस्था किंवा बँकेकडून कर्ज काढून पाणी पुरवठा योजना करण्यात येते. संबंधित योजनेतील महागड्या असलेल्या मोटारी व केबलच्या सतत चोरीने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अवकाळमुळे एकीकडे शेतीचे नुकसान,तर दुसरीकडे चोरीमुळे फटका या दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.