सातारा

सातारा : बेशिस्त व मनमानी पार्किंगमुळे अपघाताचा धोका वाढला

दिनेश चोरगे

तळमावले , पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील प्रमुख बाजार पेठेपैकी एक असलेल्या तळमावले बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. मनमानी पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळेच बेशिस्त वाहतुकीला चाप कोण लावणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पाटण तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून तळमावले बाजारपेठ उदयास आली आहे. विभागातील नागरिक कामानिमित्त तसेच खरेदीनिमित्त तळमावलेमध्ये येतात. सरकारी बँका, दवाखाने यासह अन्य सुविधाही या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळेच मागील काही वर्षात तळमावलेतील रहदारी व वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या परिसरात रस्त्यावर नेहमी गर्दी असते. त्यातच काही वाहन चालक मनमानीपणे वाहने पार्क करतात. काही जण तर कधी रस्त्याच्या मधोमध वाहन लावतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. या ठिकाणी पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. कारण वाहन चालक कोठेही वाहन उभे करून बिनधास्त फिरत असतात. त्यांना अडविणारे नाही? या अविर्भावात ते असतात. तळमावलेमध्ये कराड – ढेबेवाडीत रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केले जाते. त्याचा त्रास व्यापार्‍यांना, स्थानिक नागरिकांना होतो. कारण व्यवसायावर परिणाम होत आहे. काही वर्षांपूर्वी ढेबेवाडी पोलिसांकडून समविषम पार्किंगचा प्रयोग करण्यात आला होता. प्रारंभी या नियमाची अंमलबजावणी झाली. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे आता सम – विषम पार्किंग केवळ कागदावरच राहिले आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे भविष्यात पार्किंगची आणखी समस्या भयावह होणार आहे. म्हणून वेळीच उपाययोजना गरजेच्या असून स्थानिक ग्रामपंचायत तसेच पोलिस प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून मनमानीपणा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT