वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत चंद्रभागा ओढ्यावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने एकच खळबळ उडाली. कालव्यातील पाण्याचे लोटच्या लोट नदीसारख्या पसरलेल्या ओढ्यात घुसले. काळोख्या रात्री घडलेल्या या घटनेने ओझर्डे परिसरात हाहाकार उडाला. चंद्रभागा ओढ्याला महापूर आला. घटनेपासून सुमारे 3 कि.मी. अंतरावर ओढ्याच्या महाकाय पात्रात वसलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या या महापुराने गिळंकृत केल्या. ओझर्डेतील ग्रामस्थ व युवकांनी शर्थीचे प्रयत्न करुन सुमारे 150 मजुरांचे प्राण वाचवत त्यांना सुखरुपपणे महापुराच्या बाहेर काढले. मात्र, या कष्टकर्यांंच्या संसाराचा सगळा लवाजमा कस्पटासारखा वाहून गेला. त्यांच्या बैलगाड्या, बैलं यांनाही त्याचा फटका बसला. लाखो लिटर पाणी वाहून गेले असून शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले.
धोम धरणातून गेलेला डावा कालवा वाई, खानापूर फाटा, पांडे हद्दीतून पुढे मार्गस्थ झाला आहे. पांडे येेथे चंद्रभागा ओढ्यावरुन हा कालवा गेला आहे. सध्या या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून चंद्रभागा ओढ्यावर कालवा जीर्ण झाला होता. या ठिकाणी शनिवारी पहाटे कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की ओढ्याच्या शेजारी असणार्या शेतीची संरक्षण भिंत ढासळली तर काही शेतकर्यांचे पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. शेतकर्यांच्या शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात पाणी घुसले. हे पाणी पुढे सुमारे तीन किलोमीटर अंतरावर महाकाय पात्रात वसलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये शिरले. तहसीलदारांनी धोम पाटबंधारे प्रशासनाला फोन करून डावा कालवा बंद करण्याच्या सूचना दिल्या.