सातारा

सातारा : जिल्ह्यात हॉस्पिटलमधून कोरोना झाला हद्दपार

सोनाली जाधव

सातारा : विशाल गुजर
सातारा जिल्ह्यात कोरोना शेवटच्या घटका मोजत असल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात तब्बल दोन वर्षांनंतर बाधितांचा आकडा शून्यावर स्थिरावला आहे. जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटलमधून कोरोना हद्दपार झाला असून सर्व कोव्हिड सेंटर्सला टाळे लागले आहेत. सध्या अवघे 11 बाधित जिल्ह्यात असून ते घरीच ठणठणीत आहेत. दरम्यान, सर्व निर्बंध गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हटवल्यामुळे जिल्हावासीयांना आता दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या आतापर्यंत झालेल्या तीन लाटांमध्ये दोन लाख 80 हजारांच्या घरात बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात दि .23 मार्च 2020 रोजी दुबईवरुन आलेली खंडाळ्याची महिला पहिली बाधित आढळली. दि. 28 रोजी कॅलिफोर्निया येथून आलेल्या खेडच्या वृद्धाचा मृत्यू झाला आणि तो कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. तेव्हापासून बाधितांचा वाढणारा आकडा आता पूर्णपणे थांबला आहे. सातारा जिल्हा कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 39 हजार बाधित आढळले तर 900 जणांचा मृत्यू झाला होता. 2021 मधील फेब्रुवारीपासून दुसरी लाट सुरु झाली. यामध्ये जवळपास दोन लाख रुग्णांची नोंद झाली. तर साडे चार हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यातच म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळले. यात 5 रुग्णांना आपली दूरदृष्टी गमवावी लागली.
काही दिवसांचा दिलासा मिळताच ओमायक्रॉन या विषाणूने डोकेवर काढल्याने जानेवारी 2022 मध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली. मात्र, प्रशासन सतर्क झाल्याने व लाट कमी असल्याने जानेवारी महिन्यात 23 हजार 324 जणांना कोरोनाची लागण झाली. यामधील 91 जणांचा कोरोनाने बळी गेला. फेब्रुवारीमध्ये 3 हजाराहून अधिक बाधित तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. बाधित आकडा शून्याच्या घरात आला.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 79 हजार 180 जण बाधित आढळले आहेत. त्यातील 2 लाख 71 हजार 770 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत 6 हजार 683 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11 बाधित असून त्यातील एकहीजण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत नाहीत.
कोरोना जिल्ह्यातून संपल्यात जमा आहे. त्यामुळे सातारा जिल्हा निर्बंधमुक्त झाला आहे. निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दोन वर्षानंतर होत असलेला जत्रा यात्रांचा हंगाम जोरदार होताना दिसत आहे.

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोरोना संपला

कोरोनामुळे जग होरपळत असताना सातारा जिल्ह्यातीलही परिस्थिती काही वेगळी नव्हती. परंतु, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या योग्य नियोजनामुळे बाधितांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली. आता तर कोरोना जिल्ह्यातून संपल्यात जमा झाला आहे. दोन लाटेच्या तुलनेत तिसर्‍या लाटेची तीव्रता तर अत्यंत कमी राहिली. आता कोरोना शिल्‍लकच राहिलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT