सातारा

सातारा : जिल्ह्यात आता भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदवणार्‍या व काम करणार्‍या गावांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचा निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. जिल्ह्यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या गावास जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये व राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकास 1 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
राज्यामध्ये भूजल उपशाचे प्रमाण अधिक आहे. भूजल उपशामध्ये नगदी पिकांच्या सिंचनाकरिता भूजलाचा उपसा अधिक आहे. परिणामी, काही भागात भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा क्षेत्रांतील पाणलोट क्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित या वर्गवारीमध्ये समाविष्ट आहेत. पुनर्भरणापेक्षा अधिक भूजल उपसा विंधन विहिरीद्वारे केल्याने भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीवर होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन, अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थ सहाय्यित अटल भूजल योजना राज्यातील 13 जिल्ह्यातील 1 हजार 442 गावांमध्ये राबवण्यात येत आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे असा अटल भूजल योजनेचा गाभा असून, त्यासाठी ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्याकरिता अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करून ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेमध्ये शाश्वतता साध्य करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील या योजनेत समाविष्ट असलेल्या गावांतील नागरिकांनी सहभागी व्हावे. सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरिता हिरीरीने सहभाग नोंदवावा. त्यासाठी गावागावामध्ये सद़ृढ स्पर्धा निर्माण होण्याच्या द़ृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य ब्रीद लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन साध्य होण्याच्या द़ृष्टीने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सुरू करण्यात येत आहे. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा ही सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांत राबवण्यात येणार आहे. गावांचे मूल्यांकन करण्यासाठी तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी महसूल यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार
आहे.

असे मिळणार पुरस्कार…

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 30 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 20 लाख रुपये तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास 1 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास 50 लाख रुपये व तृतीय क्रमांकास 30 लाख रुपये देवून सन्मानित केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT