सातारा

सातारा : कोरोनाच्या शिल्लक औषधांचं करायचं काय?

मोहन कारंडे

सातारा : विशाल गुजर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे. कोरोनावर उपचारासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने उपलब्ध केलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन, पीपीई किट, अँटिजेन तपासणी किट आणि कोरोना काळातील औषधांची मागणी घटल्याने जिल्हा रुग्णालयात औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे. यातील काही औषधांची मुदत संपण्याच्या मार्गावर असून लाखो रुपये वाया जाणार आहे. त्यामुळे या औषधांची विल्हेवाट कशी लावायची? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

कोरोना संकटात अनेक जण बाधित झाले तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक औषधे मागवण्यात आली होती. यातील अनेक औषधे शिल्लक असून यातील काही शिल्लक औषधांची मुदत दोन ते अडीच महिन्यांमध्ये संपत आहेत तर काहींची मुदत पुढील वर्षी संपणार आहे. औषधांचा साठा पडून असल्याने सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे देण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, मुदत संपणार्‍या 50 हजार रुपयांपर्यंतच्या औषधांची विल्हेवाट लावण्याचे अधिकार रुग्णालयाला आहेत. त्यापेक्षा जास्त रुपयांच्या औषधांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय राज्य सरकार घेत असते. त्यामुळे ज्या औषधांची मुदत संपत आहे, अशा औषधांची यादी सरकारला पाठवण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रेमडेसिव्हिर इंजेक्शन, पीपीई किट, अँटिजेन तपासणी किट, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना देण्यात येणारे अ‍ॅम्फोटोरेसिनम तसेच हिपॅरिन गोळ्यांची कमतरता निर्माण झाली होती. रेमडेसिव्हिर आणि अ‍ॅम्फोटोरेसिनम इंजेक्शन मिळणे त्यावेळी कठीण झाले होते. दुसर्‍या लाटेत या औषधांची सर्वाधिक गरज लागली होती. परिणामी रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावेळी सरकारने कोरोना काळात लागणार्‍या सर्व प्रकारच्या औषधांचा साठा करून ठेवला होता. मात्र, दुसर्‍या लाटेनंतर कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या घटली. त्यामुळे या औषधांची आणि साहित्यांची मागणी अचानक कमी झाली. त्यानंतर ही औषधे तशीच पडून आहेत.

टेस्ट किटचा साठा सर्वाधिक

जिल्हा रुग्णालयात शिल्लक असलेल्या साहित्य आणि औषधांपैकी सर्वाधिक साठा रॅपिड अँटिजेन टेस्ट किटचा आहे. सद्यस्थितीत 75 हजार किट शिल्लक आहेत. तर व्हीटीएम किट 6 हजार 400 शिल्लक असून कोरोनाच्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी या किटचा वापर केला जातो.

मुदत संपणार्‍या औषधांची माहिती दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिली आहे. त्यानुसार ज्या ठिकाणी औषधांची आवश्यकता आहे. तिथे औषधे पाठवली गेली आहेत. मुदत संपल्यावर सरकारने दिलेल्या सूचनेनुसार औषधांची विल्हेवाट लावली जाणार आहे.
– डॉ. सुभाष कदम, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT