सातारा; पुढारी वृत्तसेवा : आधी 1 ऑक्टोबर, नंतर 15 ऑक्टोबर पण आता दिवाळी आली तरी गळीत हंगाम सुरू झालेला नाही. हंगाम नसला तरी दिवाळीपूर्वीच मराठवाडा आणि विदर्भातून टोळ्या सातारा जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. कारखाने सुरू नसल्याने त्यांची चलती बंद झाली आहे. पावसाने दैना केली असताना हाताला काम नसल्याने ऊस तोड टोळ्या अनेक भागांत सोयाबीन आणि भुईमूग काढणीची कामे करू लागली आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होवू लागला असून, कमी पैशात ही कामे होत असल्याने शेतकर्यांनाही दिलासा मिळाला आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही मोठया क्षेत्रावर उसाची लागण झाली आहे. त्यामुळे हंगामाच्या कालावधीत सर्व उसाची तोड व्हावी, यासाठी सरकारने लवकर कारखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पावसाने या निर्णयावर पाणी फेरले. पहिल्यांदा 1 ऑक्टोबर या तारखेचा विचार करण्यात आला. नंतर 15 ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली. पण, आता दिवाळी आली तरी तोडीला सुरुवात झालेली नाही.
हंगाम सुरू झाला नसला तरी मराठवाडा आणि विदर्भातील ऊस तोड टोळ्यात दसरा झाल्यानंतरच जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. पण, त्यानंतरच परतीच्या पावसानेही दणका दिला. यामध्ये जसे शेतकर्यांचे नुकसान झाले तर या टोळ्यांनाही फटका बसला. तात्पुरत्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये पाणी शिरले, संसारोपयोगी साहित्य भिजले. तर हाताला काम नसल्याने खिशात पैसे नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या भागात टोळ्या दाखल झाल्या आहेत त्यांनी पडेल ते काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोयाबीन, भुईमूग यासह विविध कडधान्यांची काढणी सुरू आहे. या कामासाठी मजूर मिळत नसल्याने उस तोडीतील मजूरच ही कामे पुढे सरसावली आहेत.
रोज 200 रुपयेवर हे कामगार ही कामे करत आहेत. कमी वेळेत जास्त काम होत असल्याने शेतकर्यांच्या पैशाची बचत होत आहे. तर हाताला काम मिळत नसल्याने मजुरांची उपासमार आता थांबली आहे. परतीचा पाऊस आता थांबला असून, दिवाळी झाल्यानंतर साधार 27 किंवा 28 रोजी कारखाने सुरू होतील. परंतु, तोपर्यंत पोटाची भूक भागवायची म्हणून हे मजूर दिवाळीसारख्या मोठ्या सणालाही मजुरीची कामे करताना दिसत आहेत.
ऊस तोड करण्यासाठी कोयत्याची जोडी असते. एका टोळीत साधारण 7 ते 10 कोयते असतात म्हणजेच एका टोळीत 20 लोक काम करत असतात. ही टोळीच गावोगावी फिरून ज्या पध्दतीने टेंडरप्रमाणे काम चालते, तशीच प्रक्रिया राबवून काढणीची कामे घेत आहेत. हजरी तसेच एका ठोक रकमेत ही कामे करून दिली जात आहे. तसेच वेगाने काम होत असल्याने दुसर्या दिवशी वेगळे काम टोळीला मिळत आहे. त्यामुळे तोडीला आलेल्या कामगारांना सोयाबीन आणि भुईमूगने तारले अशीच म्हणायची वेळ आली आहे.