सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर गाव कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 1 हजार 761 गावांचा जल जीवन मिशनअंतर्गत गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. या कृती आराखड्यामुळे गावातील प्रलंबित पाण्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची नव्याने रचना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या मिशनचे अध्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी सहअध्यक्ष आहेत. गावस्तरावर ग्राम पाणीपुरवठा समितीही गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून ग्रामसेवकांकडे जबाबदारी देण्यात आली आहे
लोकांचा सहभाग म्हणून 10 टक्के लोकवर्गणी ही भविष्यातील पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जमा केली जात आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी शासनाने सामाजिक संस्थांची निवड केली आहे. या संस्थांच्या मदतीने गावोगावी भेटी देऊन गाव कृती आराखड्यातील बाबी लोकांना समजून देण्यात येत आहेत. पाण्याचा योग्य वापर करणे, पाण्याच्या शुद्धीकरणाचे महत्त्व, पाणीपट्टी नियमित भरण्याची गरज याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस, स्वयंपाकासाठी, घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जलजीवन मिशनची अंमलबजावणी गावपातळीवर केली जात आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेसलाईन सर्वेक्षण करून पुढील 4 वर्षांचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी प्रथम गाव कृती आराखडा, जिल्हा कृती आराखडा व राज्याचा कृती आराखडा केला जात आहे. ज्या गावात स्टँडपोस्टपर्यंतच पाणी पोहोचले आहे तेथून नळाद्वारे घरात पाणी दिले जात आहे. ज्या गावांमध्ये योजना नाहीत तेथे स्वतंत्र योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या गावांचा समावेश केला गेला आहे.
ज्या गावांमध्ये पूर्वीच्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आहेत. त्या गावांमध्ये प्रत्येक घराला नळकनेक्शन देण्यात येत आहे. यामध्ये 15 व्या वित्त आयोगामधील बंधित निधीचा वापर करून नळजोडणी देण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आहे. ज्यामध्ये गावामधील वितरण व्यवस्था बदलणे, पाण्याची टाकी कालबाह्य झाली असल्यास ती नव्याने बांधकाम करणे, विहिरीच्या स्रोताचे बळकटीकरण करणे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्व कामांचा गावकृती आराखड्यामध्ये समावेश करून अंदाजपत्रके बनवली जात आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत जावली 156, कराड 223, खंडाळा 69, खटाव 146, कोरेगाव 144, महाबळेश्वर 117, माण 340, फलटण 133, सातारा 212, वाई 117 असे मिळून 1 हजार 761 गावांचे गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत.
जलजीवन मिशनअंतर्गत गावामध्ये 100 टक्के नळकनेक्शन जोडणी पूर्ण करून 55 लिटरप्रमाणे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणीपुरवठा सातत्याने करावा.
– विनय गौडा, मुख्य