सातारा : पुढारी वृत्तसेवा जी राजकीय परिस्थिती उद्भवली यात आश्चर्य नाही. मोठा धक्का मला बसला नाही. दोन वर्षापासून खदखद सुरू होती. लक्षात घेतले पाहिजे की एका विचाराने लोक एकत्रित येतात त्यांना एकत्र ठेवण्यात कोणत्याही अमिषाची गरज भासत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या टर्म संपल्या आहेत. सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. बारकाईने विचार केल्यास शिवसेना व भाजप यांचे विरोधक हे राष्ट्रवादी व काँग्रेसचे आहे. ही समीकरणे जुळणार नव्हती, अशी प्रतिक्रिया खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे म्हणाले, केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले. पण त्यांचे विचार वेगळे असल्याने एकत्र ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. हे पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असल्याने फार काळ एकत्र राहत नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठींवर भाष्य करणार नाही. पण त्यावेळी विचार करायला हवा होता की किती दिवस टिकणार हे. आमदारांना वेळ दिला जात नाही, काम होत नाही अशी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे समीकरण जुळणार नव्हते, हे सर्वांना ठावूक आहे. असेही ते म्हणाले.