कोडोली : पुढारी वृत्तसेवा महाबळेश्वर- विटा राज्य मार्गावर धामणेर ते सातारा दरम्यानच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असले तरी चिंचणेर आणि कोडोली येथील पूल कामे अपूर्ण राहिल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पावसामुळे अपूर्ण असलेल्या पूलांवर चिखल व खड्ड्यांचा राडारोडा झाला असून, तेथून जाताना वाहनांच्या रांगा लागत आहेत. दुचाकी घसरण्याने अपघात होत आहेत.
सातारा-रहिमतपूर रस्त्याचे तीनपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. परंतु, या मार्गावरील लहान मोठ्या ओढ्यांवरील पूल बांधकामे अर्धवट राहिल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. ही कामे वेगाने करण्याची गरज आहे. संबंधित विभागाने अर्धवट बांधकामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी वाहनधारकांसह येथील ग्रामस्थांनी केली आहे.
सातारा ते रहिमतपूर रस्त्याचे तीनपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच मार्गावर अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आहेत. या ओढ्यावरील अर्धवट पूल बांधकामे कासव गतीने चालू आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी पर्यायी वनवे कच्चे रस्ते काढले आहेत. मुरूम मातीने तयार केलेल्या या रस्त्यावर चिखलाचा राडारोडा झाला आहे. त्यातच मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची ऐसी की तैसी होत आहे. येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.