लोणंद; पुढारी वृत्तसेवा : मलकापूरसारखा विकास करण्यासाठी लोणंदची सत्ता एकहाती काँग्रेसच्या हाती देवून आदर्श लोणंद शहराचे स्व. बाळासाहेब बागवान यांचे स्वप्न पूर्ण करण्यास साथ द्यावी, असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दरम्यान, श्रेयवादाच्या लढाईमुळे कोत्या बुध्दीने राजकीय नेतृत्व पायात पाय घालून कामे हाणून पाडत आहे. यामुळेच लोणंदचा विकास खुंटला आहे, अशी टीकाही आ. चव्हाण यांनी दिले.
लोणंद नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, राजेंद्र शेलार, महेंद्र सुर्यवंशी, माजी सरपंच देवकीकाकू डोईफोडे, कुमार शिंदे, अॅड. सर्फराज बागवान, निलम येडगे, शैलजा खरात, ऋषीकेश धायगुडे व मान्यवर उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोणंद औद्योगिक नगरी आहे. पैसे मिळतात पण त्याचे नियोजन करण्याची कुवत लागते. जी माणसे निवडून दिली त्यांच्यात कुवत नव्हती म्हणूनच लोणंदचा विकास गतीने झाला नाही. विकास झपाट्याने करण्यासाठी सत्ता परिवर्तन करायचे आहे. ते शक्य असून मी बोलून दाखवत नाही करून दाखवणार आहे. बाळासाहेब नसल्याने पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढायची आहे. त्यांचे आदर्श शहर करायचे स्वप्न होते. नगरपंचायत करताना श्रेयासाठी विरोध केला. कोत्या बुध्दीचे राजकीय नेतृत्व पायात पाय घालून कामे हाणून पाडत आहे तसेच लोणंदमध्ये घडले आहे.
बाळासाहेंबाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार लोणंदकरांनी भव्य रॅली द्वारे केला आहे. लोणंदचे भवितव्य काँग्रेस घडवेल. काँग्रेस जाहीरनामा पूर्ण करेल. लोणंदचा क्षमतेने विकास झाला नसून वेगाने विकास करण्यासाठी लोणंदची जबाबदारी घेत आहे. प्रत्येक पक्षाची चार-पाच माणसे आल्यास कोणाचाही मेळ लागत आणि नुकसान होते. याचा अनुभव पाच वर्षात घेतला आहे त्यासाठीच एकहाती सत्ता काँग्रेसच्या हाती द्यावी.
अॅड. सर्फराज बागवान म्हणाले, स्व. बाळासाहेब यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणून आहे. 24 बाय 7 ही महत्वकांक्षी योजना पूर्णत्वास नेण्याचे स्वप्न बाळासाहेब बागवान यांचे होते ते पूर्ण करायचे आहे. गत 8 वर्षात लोणंदचा विकास झाला नाही. 11 कलमी कार्यक्रमादनवारे काँग्रेस लोणंदचा विकास करणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकावा, असे आवाहन बागवान यांनी केले.
यावेळी श्रीरंग चव्हाण, मनोहर शिंदे, राजेंद्र शेलार, दत्तात्रय खरात, प्रा. रघुनाथ शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक अॅड. हेमंत खरात यांनी केले. दरम्यान, यावेळी काँग्रेसची रॅली राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक ते गणेश मंदिर या मार्गावर पदयात्रा काढण्यात आली.