सातारा : पुढारी वृत्तसेवा
विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे मिळून 153 मते आहेत. मात्र, आम्हाला मिळालेल्या पाठिंब्यावर आम्ही 163 पर्यंत आहोत. आम्हाला यापूर्वी मदत केलेल्या अपक्षांमधील 4 ते 5 आमदारांचं मत राज्यसभा निवडणुकीत दुसर्या बाजूला गेल्याचे दिसत आहे. परंतु यात जास्त काळजीचा विषय आहे, असे वाटत नसल्याचे मत जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील हे रविवारी सातारा जिल्ह्यातील माण तालुका दौर्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ना. पाटील यांनी आमच्यात कोणताच अंतर्गत वाद नाही असे स्पष्ट केले. ना. जयंत पाटील म्हणाले, उलट आम्हाला अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यातल्या चार ते पाच लोकांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत साथ दिली नाही असं दिसतंय. या निकालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाराजी होणं साहजिक आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणे गरजेचे होते. मात्र, तो आला नाही. झालेल्या मतदानाबाबत त्यांना खुलासा झाला असेल. मात्र, याबाबत त्यांचे आणि माझे बोलणे झाले नाही, असेही ना. पाटील यांनी नमूद केले.