वाई : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्वच धरणांमधून विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरणात 10 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. शनिवारपासून धोम धरणाचे चार दरवाजे उघडून 7 हजार क्युसेकने विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कृष्णा नदीला महापूर आला असून, रविवारी विसर्ग वाढल्याने कृष्णामाईने वाईतील महागणपतीला चरणस्पर्श केला.
धोम धरण परिसरात 700 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातून खंडाळा तालुक्याला 300 क्युसेक विसर्ग कालव्यातून तर विद्युत गृहातून 350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बलकवडी धरण हे 96 टक्केभरल्यामुळे धोममध्ये पाणी सोडण्यात येत आहे. धोम धरण 13.3 टीएमसीचे आहे. सध्या धरणात दहा हजार पाचशे क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाचे चार दरवाजे दोन फुटांपर्यंत उघडून विसर्ग सुरू आहे.
विसर्ग केल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे कृष्णा नदीला महापूर आला. शनिवारी रात्रीच वाईतील प्रसिध्द महागणपती मंदिरातील सभामंडपात पाणी आले होते. तर रविवारी कृष्णामाईने महागणपीचा चरणस्पर्श केल्याचे दिसून आले. वाईकर व जिल्ह्यातील गणेश भक्तांसाठी ही बाब औत्सुक्याची समजली जाते.
कृष्णा नदीला आलेला महापूर पाहण्यासाठी वाईकर नागरिकांनी गर्दी केली आहे. धोम पाटबंधारे खात्याकडून काठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, पाऊस न थांबल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. धोम व बलकवडी धरणे भरल्याने तालुक्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटला आहे. याचबरोबर नागेवाडी धरणातही समाधानकारक पाऊस सुरू असल्याने लवकरच हेही धरण भरण्याची शक्यता आहे.