सातारा : साताऱ्याच्या आयटी पार्कला पंधरा दिवसांत मंजुरी मिळणार असून फलटणच्या एमआयडीसी लवकरच पूर्ण करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर शंभूराज देसाई तसेच रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून हे प्रकल्प मार्गी लागत असताना श्रेय मात्र बाकीचेच घेत आहेत. साताऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण देशाने पाहिले. जिल्ह्यात लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम काहीजणांनी केले, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी हल्लाबोल केला.
साताऱ्यातील गांधी मैदानावर शिवसेनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. सुहास बाबर, रवींद्र धंगेकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शरद कणसे, हणमंतराव जगदाळे, रणजितसिंह भोसले, राजेंद्रसिंह यादव, राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. उदय सामंत म्हणाले, राज्यात उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. त्यांची भक्कम साथ लाभत असल्याने मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना राज्यात नंबर एकचा पक्ष करायचा आहे. जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प तसेच विकासकामे मार्गी लागली आहेत. मात्र आम्ही केलेल्या कामांचे श्रेय इतर घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य निवडून आले.
यापुढे जिल्ह्यातील सहकारी संस्थाही ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यासाठी शिवसैनिकांना आवश्यक सर्व सहकार्य करणार आहे. साताऱ्यातील एमआयडीसीच्या जागेत मराठी भाषेचे दालन निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणाही मंत्री उदय सामंत यांनी केली.