दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळवाडी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारे येरळा नदीचे हेच पाणी कृष्णा नदीकडे झेपावले आहे. Pudhari Photo
सातारा

दुष्काळी खटावमधील येरळा नदी झेपावली कृष्णेकडे!

येरळवाडी धरणातील विसर्ग; सांगली जिल्ह्यात कृष्णेशी संगम

पुढारी वृत्तसेवा

खटाव : अविनाश कदम

दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळा नदीचे पाणी चक्क सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या संगमाकडे वेगाने झेपावले आहे. उद्यापर्यंत येरळा नदीचे पाणी ब्रम्हनाळ येथे कृष्णेत जाऊन मिसळणार आहे. दुष्काळात ज्या कृष्णा नदीच्या पाण्याने येरळेचे कोरडे पात्र प्रवाहित केले जाते त्याच येरळा नदीचे पावसाळ्यातील पाणी आता कृष्णा नदीला मिळणार आहे. दुष्काळी खटाव तालुक्यात जून महिन्यात रेकॉर्डब्रेक पर्जन्यवृष्टी झाली होती. कधी नव्हे ते जूनमध्येच येरळा नदी प्रवाहित झाली होती. जुलैच्या अखेरीस येरळवाडी धरणही भरुन ओव्हरफ्लो झाले होते. धरणातील सांडव्यावरून होणारा पाण्याचा विसर्ग येरळा नदीतून पुढे सांगली जिल्ह्यातील कृष्णेच्या पात्राकडे झेपावला आहे.

कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी म्हणून येरळा नदीचा उल्लेख होतो. प्राचीन काळी ही नदी वेदावती या नावाने ओळखली जात होती. भगवान श्रीराम यांच्यासह अनेक ऋषींनी या नदीकाठावर वेदपठण केल्याची आख्यायिका आहे. येरळा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील म्हस्कोबाच्या डोंगरावरील सोलकनाथ टेकडीवर झाला आहे. येरळा नदी वर्धनगडने वेढलेल्या रांगेतून वाहत जाते तर नदीच्या डाव्या बाजूस महिमानगड रांग आहे. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी खटाव, खानापूर, तासगाव आणि पलूस तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी सहामाही वाहिनी असून, इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. या नदीवर नेर आणि येरळवाडी ही दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी खोर्‍यांचे एकूण क्षेत्रफळ 3041 चौरस किमी असून नदीची लांबी 125 किमी इतकी आहे. येरळा नदीची नांदणी ही उपनदी आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे येरळा नदीचा कृष्णा नदीशी संगम होतो.

वेदावती (येरळा) नदीची आख्यायिका...

फलटण तालुक्यातील (दंडकारण्य) ताथवडे घाटातील खटाव- माण सरहद्दीवरील पहिला डोंगर म्हसकोबाचा डोंगर आहे. कुळकजाई परिसरात खटाव-माण तालुक्याच्या सरहद्दीवर पुरातनकाळी भगवान श्रीराम वेदपठण करत होते. त्यावेळेस लक्ष्मणाने सीतामाईच्या उशाशेजारी एक गरम आणि एक गार पाणी असलेला असे दोन द्रोण ठेवले होते. पूर्व दिशेचा द्रोण म्हणजे माणगंगा, तर उत्तरेचा द्रोण बाणगंगा नदी अशी त्या काळी नावे होती. नंतर श्रीराम यांनी या ठिकाणी वेदपठण केल्याने बाणगंगेला वेदावती असे नाव पडले, तर सीतामाईंनी येरळा नदीचे रूप धारण केल्याची आख्यायिका आहे.

दुष्काळात असतो नेमका विरोधाभास...

दुष्काळ पाचवीला पुजलेल्या खटाव तालुक्यातील येरळा नदीचे पात्र नोव्हेंबरपासूनच कोरडे पडते. पावसाळा सुरू झाल्यावर परतीच्या मान्सूनचा जोरदार पाऊस झाला तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नदीला पाणी येते. आठ महिने कोरडी असणार्‍या येरळा नदीच्या पात्रात जिहे-कठापूर योजनेद्वारे कृष्णा नदीचे पाणी नेर तलावातून सोडण्यात येते, म्हणजेच येरळेला प्रवाहित करण्यासाठी दरवर्षी कृष्णा धावते. यावर्षी मात्र चक्क ऑगस्टच्या सुरुवातीलाच दुष्काळी येरळा कृष्णेकडे झेपावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT