सातारा : कोरेगाव विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे प्रचंड विकासकामे केली. त्यामुळे निवडणुकीत विरोधकांच्या भूलथापांना आणि कारस्थानांना मतदार भूलला नाही. भूमिपुत्र असल्यामुळेच कोरेगावच्या जनतेने पुन्हा आमदार केले. कोरोना काळात निधड्या छातीने लोकांना मदत करत असताना विरोधक वाशीला गेले, असा घणाघात आ. महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.
आ. महेश शिंदे म्हणाले, भूमिपुत्र म्हणून कोरेगाव मतदारसंघातील जनतेने मला प्रेम दिले. भूमिपुत्राचा एल्गार काय असतो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. विरोधक ताकदीनिशी मैदानात उतरला असताना कुटिल कारस्थाने केली. जनतेत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा आमदार कसा वागतो हे जनतेला माहित आहे. निवडणूक झाल्यानंतर लगेच मतदारसंघातील कामांना सुरूवात केली आहे. कोरेगाव मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. सिंचनाचे अडीच हजार कोटींचे प्रकल्प राबवण्यास प्राधान्य राहणार आहे. मतदारसंघातील रस्त्यांची कामे पूर्णत्वाला नेणार आहे. तीन महिन्यांत 1100 महिलांना रोजगार देणार आहे. तरुणांसाठीही रोजगार निर्मिती केली जाणार आहे.
भूमिपुत्र म्हणजे स्थानिक, तुम्ही भूमिपूत्र असता तर कोरेगावचे पाणी सांगलीला दिले असते का? जलसंपदा मंत्री असताना कोरेगावला 1 टक्काही निधी सिंचनाला दिला नाही. वाशीला न जाता कोरोना काळात माझ्यासारखे निधड्या छातीने लढला असता, असा टोलाही आ. महेश शिंदे यांनी आ. शशिकांत शिंदे यांना लगावला. मंत्रिपदाबाबत विचारले असता आ. महेश शिंदे म्हणाले, पदे येतात-जातात. मला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मतदारसंघातील 98 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येत नाही तोपर्यंत सरकारी पदाचा लाभ घेणार नाही. लाल दिवा वापरणार नाही.
ईव्हीएम घोटाळ्याच्या टीकेबाबत विचारले असता आ. महेश शिंदे म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएम हॅक करता येत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत जादा जागा निवडून आल्यावर ईव्हीएम हॅक झाल्याची तक्रार विरोधकांनी का केली नाही? कोरेगाव मतदारसंघात मला मताधिक्य देणार्या 50 बुथवर कमी मते मिळाली आहेत. पराभवानंतर प्रत्येकजण पळवाटा शोधत असतो, अशी टीका त्यांनी केली.
आ. महेश शिंदे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळीच जाहीर सभेत महायुतीला विधानसभा निवडणुकीत 220 पेक्षा जादा जागा मिळतील हे स्पष्ट केले होते. महायुती सरकारमधील कोणत्याही आमदाराबद्दल नकारात्मक वातावरण नव्हते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदार संघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले. अपवाद वगळता सर्व आमदार निवडून आले. सिंचन प्रकल्प मार्गी लागत आहेत. लाडकी बहिण योजनेमुळे माता-भगिनींनी आशीर्वाद दिला आहे.
आ. महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघातील 21 गावांतील पुनर्वसित धरणग्रस्तांचे प्रश्न दीड महिन्यांत सोडवणार आहे. मंत्रिपद मिळावे ही मतदारसंघातील लोकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. काही ठिकाणी थांबणे व पुढे सरकणे उचित असते. देगाव-निगडी पाणी योजनेचे महिन्यात टेंडर काढून तीन महिन्यांत काम सुरू करणार आहे. परिसरातील सर्व गावे बागायत करणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, संदीपभाऊ शिंदे, राहूल बर्गे, अतुल माने उपस्थित होते.