सातारा : ठाकरे गटातील नेते उठसूट भाजपावर टीका करत आहेत त्यांच्या लोकांचा त्यांच्यावरच विश्वास राहिला नाही. त्याला दुसरे पक्ष किंवा नेतृत्व कसे जबाबदार राहणार? शेवटी तुम्ही तुमच्या लोकांना विश्वासात घेत नाही. त्यामुळे पक्षात पदाधिकारी थांबत नाहीत? स्वत:चे अपयश व खापर दुसऱ्यावर फोडण्याचे कारण नाही. ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
सातारा तहसिल कार्यालय परिसरात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. ते म्हणाले, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षाच्या ताकदीने महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. जेवढे महायुतीचे मतदान आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेवून महायुतीचे उमेदवार निवडून येतील. सोमवार दि. २२ रोजी मतमोजणीदिवशी चित्र स्पष्ट होईल. मतदारांनी महायुतीवर विश्वास ठेवला आहे. आम्ही सर्वजण एकसंघच आहोत. राष्ट्रवादी व भाजपा, शिवसेना शिंदे गट हे आम्ही एकत्र आहोत मनात कोणतीही खंत नाही.
ठाकरे गट फुटणार या प्रश्नावर बोलताना ना.शिवेंद्रराजे म्हणाले, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याबद्दल उध्दव ठाकरे व त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच सांगितले पाहिजे. भाजपानेही स्पष्ट केले आहे की याच्यामध्ये आमचा कुठेही संबंध नाही. उठसूठ भाजपावर टिका करायची हेच सुरू आहे. त्यांच्या लोकांच्या त्यांच्यावरच विश्वास राहिला नाही. त्याला दुसरे पक्ष किंवा नेतृत्व कसे जबाबदार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.