सातारा : जावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू म्हणून प्रतापगड साखर काराखान्याची आोळख आहे. गत वर्षीचा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाला आहे. तालुक्यातील शेतकरी आणि कारखान्याचे कामगार यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी प्रतापगडचा आगामी गळीत हंगामही यशस्वी करू, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सोनगाव (ता. जावली) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सन 2025- 2026 च्या गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. याप्रसंगी ना. शिवेंद्रराजे बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे आदी मान्यवरांसह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.
ना. शिवेंद्राजे म्हणाले, अनेक वर्षापासून बंद असलेला प्रतापगड कारखाना आपण अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून दोन वर्षांपासून सुरू केला आहे. मागील गळीत हंगाम आपण सर्वांनी मिळून यशस्वी करून दाखवला. काराखाना सुरळीत चालला तर आगामी काळात ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व येथील स्थानिक जनतेचे आर्थिक जीवनमान नक्की उंचावेल. कारखान्यतील कामगारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. तेही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करत आहे. शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला आर्थिकद़ृष्ट्या सक्षम होण्यास अजून थोडा वेळ लागणार आहे. कारखानदारीतील स्पर्धा मोठी असून इतर कारखान्याची आपण लगेच बरोबरी करू शकणार नसलो तरी त्यांच्या बरोबरीने चालण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत.
सौरभ शिंदे म्हणाले, ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने व अजिंक्यतारा-प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यामातून प्रतापगड कारखाना होऊ घातलेला हंगाम यशस्वी करणार आहे. आगामी हंगामाच्या द़ृष्टीने आवश्यक ती सर्व कामे जोमाने सुरू आहेत. कारखान्याच्या व्यवस्थापनानाने सुरू केलेल्या ऊस नोंदीला तालुक्यातील शेतकर्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून 7 हजार 300 हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखाना सुस्थितित चालण्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपल्या उसाच्या नोंदी कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सातारा आणि जावली तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.