कवठे : जिल्ह्याचे राजकारण कोणत्या दिशेने न्यायचे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. गेल्या 50-60 वर्षांत जिल्ह्याने जोपासलेली राजकीय परंपरा काही मंडळी जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पैशाच्या जोरावर चुकीचे विचार जिल्ह्यावर लादण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. अजितदादांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन खा. नितीनकाका पाटील यांनी केले.
केंजळ, ता. वाई येथे वाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट व गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप पवार, श्रीकांत वीर, सत्यजित वीर, राहुल डेरे, संदीप पोळ, दादा गायकवाड, शेखर फरांदे, विक्रम पिसाळ, अनिल जगताप, भैय्यासाहेब पिसाळ, रामदास इथापे, किरण जाधव, चेतना जाधव, सुकुमार जगताप, शरद पवार गटाचे संतोष पवार, रयत क्रांती संघटनेच्या शितल गायकवाड यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. पाटील म्हणाले, स्व. अजितदादा पवार यांनी 1999 पासून सातारा जिल्ह्यातील विकासकामांमध्ये मोलाचा वाटा उचलला. जिल्ह्यात राबवलेले अनेक प्रकल्प त्यांच्या मान्यतेनेच पूर्ण झाले. वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील विकासकामांसाठी मकरंदआबा पाठपुरावा करायचे आणि अजितदादांकडून मंजुरी मिळायची, असे एक समीकरण होते. दादांच्या जाण्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.
काही बाहेरचे लोक जिल्ह्यात येऊन नको असलेली संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. किसन वीर, यशवंत विचार, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित राजकारण आपण केले. मात्र, सध्या पैशाच्या जोरावर चुकीचे विचार लादले जात आहेत. ते थोपवण्याची गरज आहे. ज्यांनी तिन्ही कारखाने बुडविले, तेच आज विरोधकांच्या साथीने दिशाभूल करत आहेत. यशवंत विचार पुन्हा जोपासण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांच्या पाठिशी रहा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक माजी उपसरपंच निलेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कदम यांनी केले. कुमार जगताप यांनी आभार मानले.