सातारा : पुढारी वृत्तसेवा
विघ्नहर्त्या बाप्पांच्या पाठोपाठ मंगळवारी घरोघरी गौराईंचे आगमन होणार आहे. सोनपावलांनी गौराईंची स्वारी घरी येत असल्याने त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी महिलावर्गाची धांदल उडाली आहे. दोन दिवसांचा मुक्काम करुन गुरुवारी गौरी विसर्जन होणार आहे. त्यामुळे माहेरपणासाठी आलेल्या गौरींच्या सरबराईसाठी महिला वर्ग सज्ज झाला आहे. दरम्यान, बाजारपेठेतही गौराईंचे मुखवटे, दागिने व मेवा मिठाई खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
विघ्नहर्त्याच्या आगमनाने घरोघरी आनंदोत्सव सुरु झाला आहे. मंगळवार दि.12 सप्टेंबर रोजी गौरी आवाहनाने या आनंदात आणखी भर पडणार आहे. गौराईंच्या सोनपावलांनी होणार्या आगमनाची उत्सकुता संपणार असून दोन दिवस घरात पहुणाचारासह भक्तीचा सागर उसळणार आहे. सोनपावलांनी गौरींची स्वारी घरी सुख समृद्धी घेऊन येणार असल्याची नांदी मिळणार आहे. गौराईंच्या पाहुणचारात कोणती कसर राहू नये यासाठी महिलावर्गाची धांदल उडाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वागतापसून ते सरबराई करण्यासाठी बाजारपेठही सज्ज झाली आहे.
बाजारपेठेत गौराईंच्या आकर्षक मुखवट्यांसह मोती, कुंदनसह विविध धातूंच्या दागिन्यांना महिला वर्गातून पसंती मिळत असून गौरींसाठी नवीन साड्या, खण, नारळाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. तसेच गौरींसाठी लागणार्या फराळाची तयारी सुरु असल्याने या पदार्थांचा खमंग वास घराघरात दरवळू लागला आहे. कामाच्या व्यापात घरात फराळ करणे शक्य नाही अशा महिलांची गैरसोय रेडीमेड फराळाने दूर होणार आहे. बाजारपेठेत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दरम्यान, गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहर व परिसरात पानपत्री, दुर्वा, सुतगुंडी, वाण-वस्याच्या साहित्याच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती.
यावर्षी पंचांगानुसार मंगळवार दि.10 सप्टेंबर रोजी गौराईंचे आवाहन आहे. सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे. तसेच या दिवशी दु. 3 ते 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहू काळ असल्याने या वेळेत गौरी आगमन टाळावे. बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन तसेच रात्री जागर केला जाणार आहे. गुरुवार दि. 12 सप्टेंबर रोजी प्रात:काळात गौरी विसर्जन होणार आहे.