सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाच्या धुवाँधार सरी कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कृष्णा, कोयना, वेण्णा, कुडाळी, तारळी, उरमोडी या नद्या दुथडी भरून वाहत असून पूरसद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर दरड कोसळली तर पश्चिम भागात विविध ठिकाणचे साकव, पूल पाण्याखाली गेल्याने गावे संपर्कहीन झाली.गेले पाच दिवस सातारा शहर परिसरामध्ये संततधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू ठेवली असून मंगळवारी रात्रीपासूनच जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभरही या पावसाचा जोर प्रचंड होता. पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले चार दिवस
सूर्यदर्शन झालेले नाही. बुधवारी सकाळपासून सोसाट्याचे वारे आणि जोरदार सरी यामुळे नागरिकांनी घरीच बसणे पसंत केले असून शहरातील प्रमुख रस्ते सुने सुने दिसत होते. शहरातील राजवाडा, राधिका रोड, नगरपालिका, आर्यांग्ल हॉस्पिटल, वाढे फाटा, भूविकास बँक परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट, खेड नाका, यासह अन्य परिसरात पाण्याची मोठी तळी निर्माण झाली होती. यामुळे वाहनधारकांसह पादचार्यांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातासारखे प्रसंग घडले.शुक्रवार पेठेत जोरदार वार्यामुळे विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन तासानंतर वीज पुरवठा सुरळीत केला. किल्ले अजिंक्यतारा रस्त्यावर दरड कोसळली. महाबळेश्वर तालुक्यातील खंबिल गावाजवळ डोंगर खचला आहे. परळी खोर्यात शिंदेवडी, लावंघर मस्करवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. पाटेघर व जुगाईदेवी येथील येथील पुलावरून नदीचे पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. आरेदरे सोनवडी गजवडी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
झाली. लावंघर गावातील सांडवा तलावाची भिंत पावसामुळे वाहून गेली आहे. किल्ले सज्जनगडाकडे जाणार्या रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सातारा शहरातील अनेक अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी पार्कींगमध्ये तर काही ठिकाणी दुकानामध्ये पाणी साचले होते. बुधवार पेठेतील काही जुन्या घरांच्या भिंती पडल्याने नुकसान झाले. मर्ढे येथील कृष्णा नदी पुलावरुन नदीचे पाणी गेले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पुणे-बंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी 10.30 पर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 30.3 मि.मी. जावली 63.9 मि.मी. , पाटण 49.0 मि.मी., कराड 30.4 मि.मी., कोरेगाव 13.7 मि.मी., खटाव 4.2 मि.मी., माण 2.7 मि.मी., फलटण 1.6 मि.मी., खंडाळा 6.5 मि.मी., वाई 30.4 मि.मी. महाबळेश्वर 124.1 मि.मी असा मिळून सरासरी 28.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पाटण : कोयना धरणांत प्रतिसेकंद सरासरी 55,522 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणात बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यर्ंत 70.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1,050 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. मागील 24 तासांत पाणीसाठ्यात 4.79 टीएमसीने वाढ झाली.मंगळवारी चोवीस तासात व आजपर्यंतचा एकूण पाऊस कंसात : कोयना 168 मि.मी. (2961), नवजा 226 (3491) तर महाबळेश्वर 190 (2892).