मेढा : म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी वसंतराव मानकुमरे हाच एकमेव भक्कम पर्याय आहे. विकास कामे खेचून आणण्याची धमक असणारे व लोकांसाठी धाडसाने उभे राहणारे असे हे नेतृत्व आहे. त्यामुळे जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं रहावं, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
म्हसवे गटातील भाजपचे उमेदवार वसंतराव मानकुमरे (भाऊ) व म्हसवे गणातील उमेदवार सौ. रेश्मा पोफळे यांच्या प्रचारार्थ म्हसवे येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती तानाजी शिर्के, भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे, माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, हिंदुराव तरडे, समाधान पोफळे, अजित इंदलकर, प्रमोद शिंदे, सौ. वैशाली कांबळे, शुभम कांबळे, कु. अंकिता जगताप, सौ. प्रियांका कांबळे उरणकर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, म्हसवे जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय आरक्षित असला तरी सर्व समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणून वसंतराव मानकुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा, विकासाला प्राधान्य देणारा चेहरा म्हणजे वसंतराव मानकुमरे. त्यांच्या विजयासाठी सर्वांनी सामुदायिकरित्या प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यात सातारा जिल्हा परिषदेमध्ये ते माझ्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड अधिक वेगाने पुढे नेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, जावली तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीमध्ये विकास पोहोचवला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात सातत्याने काम केलं. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपचं मताधिक्य वाढतच आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपाला विकासकामांची पोहोचपावती द्यावी.
वसंतराव मानकुमरे म्हणाले, आज संपूर्ण जावली तालुक्यात विकासकामांबाबत जनतेमध्ये जागरूकता आहे. सतत संपर्क आणि प्रामाणिक काम केल्यामुळेच मला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. पुढील काळात ही विकासाची गंगोत्री आणखी वेगाने वाहती ठेवण्याचा माझा संकल्प आहे.