सातारा : शिरवळ परिसरात गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या दोघांच्या टोळीला सातारा व पुणे जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शिरवळ, खंडाळा परिसरातील गुन्हेगारीवर अंकुश येण्यास मदत होणार आहे.
अजिंक्य ऊर्फ पप्पू अलबत कांबळे (वय 33, रा. शिरवळ), इम्रान कलाम काझी (38, रा. शिरवळ, ता. खंडाळा) अशी संशयितांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध शिरवळ परिसरात सातत्याने मालमत्तेविरुद्धचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून विनयभंग करणे, रस्ता अडवून शिवीगाळ दमदाटी करणे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून खंडणी मागून शिवीगाळ दमदाटी करणे, असे गुन्हे दाखल आहेत. या दोघांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही.
अखेर तडीपारीसाठी या दोघांचा प्रस्ताव पोलिसांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवला. साताऱ्यात सुनावणी झाली असता दोघांना सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हा हद्दीतून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आगामी काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारां विरुद्ध हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार आहेत.