सातारा : झेडपी व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची निवडणूकपूर्व युती झाली होती. एकत्र निवडणूक लढून आम्ही जिल्हा परिषदेच्या 37 जागा जिंकलो. मात्र बहुमत असतानाही या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष घेऊन येऊ शकलो नाही, याची खंत वाटते. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी जे घडले त्यावर एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रखर भूमिका मांडली. एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करणार, असा निर्धार पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केला.
साताऱ्यातील गांधी मैदानावर शिवसेनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री ना. शिंदे, ना. उदय सामंत, आ. सुहास बाबर, रवींद्र धंगेकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, शरद कणसे, हणमंतराव जगदाळे, रणजितसिंह भोसले, राजेंद्रसिंह यादव, राजाभाऊ बर्गे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मी दोघेही कोयनेचे सुपूत्र. जनतेला दिलेला शब्द काहीही करून पूर्ण करायचा, ही शिकवण शिंदे यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळाले. एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेला आश्वासक चेहरा मिळाल्याने हा इतिहास घडला. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांचा कौल आमच्या युतीला आहे. या निवडणुकांमध्ये कुणालाही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. मोठ्या पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढली.
मात्र बहुमत असूनही अध्यक्ष, उपाध्यक्ष करू शकलो नाही. विधानसभेत शिंदे यांनी यावर आवाज उठवला. सहकाऱ्यासाठी धावून जाणारे, सर्वस्व पणाला लावणारे शिंदे हे नेते आहेत. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणीप्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावले. मुनावळे, हेळवाक, पापर्डे येथील वॉटर स्पोर्ट व पर्यटन प्रकल्प, क्षेत्र महाबळेश्वर, महाबळेश्वर व पाचगणी परिसराचा विकास, कांदाटी खोऱ्यात दर्जेदार सी लिंक पूल अशी अनेक कामे मार्गी लावली. राज्याच्या पर्यटन क्षेत्राचा रोडमॅप तयार असून तो लवकरच मार्गी लागणार आहे.
जगाच्या नकाशावर महाराष्ट्र डेव्हलप टूरिस्ट डेस्टेिनेशन बनवण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवायची असेल तर शिवसेना वाडी-वस्तीवर, तांड्यावर, गावागावात पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.