मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीत झालेल्या झटापटीचे तीव्र पडसाद सोमवारी विधिमंडळात उमटले. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असा प्रकार कधी घडला नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतच नाराजी बोलून दाखविली. तर, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला हिंसक वळण लागले. काही सदस्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यासाठी थेट पोलिस बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप झाला. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापरकरून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न केला गेला, अशी टीका केली.
शिवसेना आमदारांच्या घोषणा
विधानसभेत शिवसेना आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणा सुरू केल्या तेव्हा बावनकुळे यांनी सर्वांना आवरण्याचा प्रयत्न केला.