सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी शनिवारी होणार आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या 100 मीटर परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून सभा संपेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
20 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात म गर्दी केली होती. यावेळी राडा झाला. तसेच दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी झाली होती. त्यामुळे तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. त्याचे पडसाद राज्याच्या विधिमंडळातही उमटले होते. या पार्श्वभूमीवर, शनिवारी होणाऱ्या समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन तसेच शिक्षण व अर्थ समित्यांच्या सभापती निवडीच्या वेळी पुन्हा असा प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद इमारतीपासूनचा 100 मीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि पोलिसांनाच प्रवेश देण्यात येणार आहेत.
उल्लंघन झाल्यास कारवाई
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.