सातारा : जिल्हा परिषद शाळांच्या 220 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग खोल्या दुरुस्तीसाठी मास्टर प्लॅन तयार करणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत धोकादायक वर्ग खोल्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच पाच दिवसांत वर्ग खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडून घेण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या 220 वर्ग खोल्या धोकादायक, विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने शाळांचे वास्तव चित्र समोर आणले. त्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी दैनिक ‘पुढारी’मधील वृत्ताची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभाग शाळा खोल्या दुरुस्तीसाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचे सांगितले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व समग्र शिक्षाचे अभियंता, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून शाळांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा धोकादायक आहेत त्यांचे प्राधान्याने निर्लेखन करण्याचे प्रस्ताव मुख्याध्यापकांकडून पुढच्या पाच दिवसांमध्ये घेण्यात येणार आहेत .
शाळांच्या धोकादायक वर्ग खोल्याच्या निर्लेखनाची युद्ध पातळीवर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. निर्लेखनाचे आदेश पुढच्या 15 दिवसांमध्ये ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव पुढच्या 15 दिवसांमध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. सर्व प्रस्तावांची छाननी करून दुरुस्ती आवश्यक असणार्या शाळांना निधी पुरवला जाणार आहे. याबाबतचे सर्व आदेश येत्या दोन दिवसांमध्ये निर्गमित करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी धोकादायक खोल्या आहेत त्या ठिकाणी मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश सर्व पर्यवेक्षीय यंत्रणा व व्यवस्थापन समितींना देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.