सातारा : सातार्यातील वायसी होस्टेलमधून उडी मारुन विद्यार्थिनीनेे आत्महत्या केल्याप्रकरणी कॉलेजचे प्राचार्य, हॉस्टेलचे रेक्टर व होस्टेल कमिटी सदस्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रेक्टर जयश्री जकाते यांना अटक केली. इतर संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. मुलीच्या वडिलांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जयश्री जकाते, वायसी कॉलेजचे प्राचार्य एस. टी. साळुंखे व होस्टेल कमिटी सदस्य यांच्या विरुद्ध भानुदास एकनाथ बिरामणे (वय ५५, रा. आंब्रळ पो.खिंगर ता.महाबळेश्वर) यांनी तक्रार दिली आहे.
सृष्टी बिरामणे (१८) या विद्यार्थिनीनेे २ सप्टेंबर रोजी वायसी काॅलेजमधील होस्टेलमधून तिसर्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. सोशल मीडिया, आंदोलन, वायसी कॉलेजकडून पत्रकार परिषद यामुळे वातावरण ढवळून निघाले होते. अशातच घटनेच्या तिसर्या दिवशी ५ सप्टेंबर मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
भानुदास बिरामणे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सृष्टी फोनद्वारे रोज संपर्कात होती. सृष्टीने फोनवरून रेक्टर जकातेे यांचे वागणे, बाेलणे तसेच होस्टेलमधील गैरसोईबाबत तक्रार सांगत होती. त्यानंतर रेक्टर फोन आला. फोन वर त्या म्हणाल्या, 'सृष्टीसह तीन मुलींना होस्टेलमधून काढून टाकणार आहे. मुलीला घेऊन जा. कमिटीचे लोक थांबले आहेत. तुम्ही लवकर या,’ अशा प्रकारे साडेसहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान दोन फोन आले. हाेस्टेलवर पोहोचल्यानंतर मात्र तेथून सिव्हीलमध्ये जाण्यास सांगितले. सिव्हीलमध्ये पोहोचलो असता सृष्टीचा मृत्यू झाल्याचे सांगताच धक्का बसला.
दुर्लक्ष, दबावाचा तक्रारीत उल्लेख...
सृष्टीसह तिच्या इतर दोन मैत्रिणींना होस्टेलमधून काढून टाकले जाणार. पोलिस ठाण्यात तक्रार करणार, असे म्हणून होस्टेलच्या रेक्टर व कमिटी सदस्यांनी दबाव आणला. कमिटी सदस्यांनी सृष्टीचा कबुलीबाबत जबरदस्तीने व्हिडीओ काढला. त्यातूनच सृष्टीने मृत्यूपूर्वी इंग्रजीतून चिठ्ठी लिहिली. तिचे काेणतेही समुपदेशन झाले नाही व तिला विश्वासात न घेतल्याने तिने या सर्व दबावामुळेच आत्महत्या केली. या सर्व बाबीकडे कॉलेजच्या प्राचार्यांनी दुर्लक्ष केले. रेक्टर मॅडमचा वारंवार होणारा त्रास व कमिटीच्या दबावामुळे सृष्टीने हे कृत्य केल्याचे तक्रारीत तिच्या वडिलांनी म्हटले आहे.