सातारा : सातारा ते रहिमतपूर मार्गावरील तासगावजवळ मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कारच्या बाहेर फेकली गेल्याने व चाकाखाली आल्याने महिला ठार झाली. या अपघातात गुरसाळे, ता. खटाव येथील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सौ. सुनीता धनाजी जाधव (वय ३६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अमर लतीफ मुलाणी (33), धनाजी शिवाजी जाधव (४८, सर्व रा. गुरसाळे, ता. खटाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा-रहिमतपूर-तासगाव मार्गावर इनोव्हा कारचा मध्यरात्री अपघात झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण झाला की वाहनाच्या दोन-तीन पलटी झाल्या. यावेळी महिला काच फुटून बाहेर फेकली गेली. यानंतर कारच्याच चाकखाली आली.
प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या धडकेत इनोव्हा कारची काच फुटल्याने संबंधित महिला वाहनाबाहेर फेकली गेली. त्यानंतर ती वाहनाच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात वडूज तालुक्यातील गुरसाळे गावातील दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.
या बचावकार्यात चंद्रसिंग पवार, रोहित बनसोडे, ऋषीकेश रंकाळे, देवा गुरव, अथर्व बिडकर, अभिजित शेलार यांच्यासह हायवे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
वाचविण्याचे प्रयत्न ठरले निष्फळ
अपघातानंतर महिला वाहनाखाली अडकल्याची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त इनोव्हा वाहनाखाली अडकलेल्या महिलेला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने तातडीने प्रयत्न सुरू केले. सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नांनंतर महिलेला वाहनाखालून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.