सातारा : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील 55 गावे व 351 वाड्यांमधील 78 हजार 21 नागरिक व 50 हजार जनावरांची तहान 60 टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यापासून सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढू लागला आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची अवस्था बिकट झाली आहे. भूजल पातळीही खालावत चालली आहे. नदी, नाले, ओढे, साठवण बंधारे, तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे सर्वत्रच पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस माण तालुक्यासह अन्य भागात टँकरची मागणी वाढू लागली आहे. प्रशासनामार्फत गावोगावी टँकर सुरू असले तरी हे टँकर गावात वेळेवर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
माण तालुक्यात बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगिरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभूखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारुगड, कुळकजाई, शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, उकीर्डे, कोळेवाडी, परकंदी, शिंदी बु., महिमानगड, सुरुपखानवाडी, दोरगेवाडी यासह 45 गावे व 332 वाड्यांमधील 68 हजार 143 नागरिक व 44 हजार 975 जनावरांना 47 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, शिद्रुकवाडी वरची, काढणे, भोसगाव, चव्हाणवाडी नाणेगाव यासह 1 गाव व 4 वाड्यांमधील 1 हजार 586 नागरिक व 987 जनावरांना 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव गावठाण, गुंडेवाडी गावठाण, बालेघर, आनंदपूर, गडगेवाडी, कासुर्डेवाडी, अनपटवाडी यासह 4 गावे व 3 वाड्यांमधील 3 हजार 580 नागरिक व 1 हजार 455 जनावरांना 2 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील भंडारमाची व बिचुकले या दोन गावातील 1 हजार 827 नागरिक व 1 हजार 585 जनावरांना दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील मांजरवाडी, नवलेवाडी, जायगाव यासह 3 गावे व 12 वाड्यांतील 2 हजार 885 नागरिक व 1 हजार 52 जनावरांना 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
सातारा जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्या गावात विहिरी व कूपनलिकेंना मुबलक पाणी आहे. अशा विहिरी व कूपनलिका प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत. माणमध्ये 14 विहिरी व 6 कूपनलिका, वाई 3 विहिरी, कोरेगाव 1 विहीर, कराड 3 विहिरी, खंडाळा 1 विहीर व 1 कूपनलिका, खटाव 2 विहिरी व 1 कूपनलिका अधिग्रहीत केली आहे.