सातारा : वाई आणि पाटण मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दरम्यान बाहेरच्या मंत्र्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या वल्गना देण्यात आल्या. मात्र, दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मोठ्या संख्येने जागा निवडून देऊन जनतेनेच या संबंधित मंत्र्यांना खऱ्या अर्थाने चपराक दिली आहे, असा टोला राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंदआबा पाटील यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला.
सत्ता स्थापनेसंदर्भात ना. मकरंद पाटील यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. नंतर मात्र कार्यकर्त्यांनी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिले. राष्ट्रवादी एकत्र झाली. जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला. मित्र पक्ष असलेल्या भाजपने आधीच स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते; पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करून आम्ही निवडणूक लढवली. त्यात आम्हाला चांगले यश आले आहे. आता वरिष्ठ काय म्हणतात, कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेऊन सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेतला जाईल.