वडूज : खटाव तालुक्यातील वरुड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्याची घटना घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरूड येथील कोल्हे खिंड शिवारातील तलावाजवळ राजेंद्र सुखदेव सूर्यवंशी यांच्या शेडमध्ये दोन शेळ्या व चार बोकड असे एकूण सहा जनावरे बांधली होती. नेहमीप्रमाणे रात्री शेळ्या गोठ्यात बांधून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटेच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या लांडग्यांच्या कळपाने हल्ला चढवून सहा शेळ्या ठार केल्या. सकाळी सातच्या सुमारास राजेंद्र सूर्यवंशी यांचा मुलगा शेडमध्ये आला असता त्याला सहा शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी वनरक्षक उत्तम पांढरे, अनिल देशमुख, डॉ. प्रतिक जाधव, डॉ. प्रकाश बोराटे, डॉ. किरण भिसे, पोलीस पाटील अण्णासाहेब जाधव, दादासाहेब सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.