सातारा : वादळी पावसानंतर कमी झालेल्या तापमानाचा पारा दोन दिवसांनंतर पुन्हा चढू लागला आहे. शनिवारी साताऱ्याचे तापमान 40.1 अंशापर्यंत पोहचले असून थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरही तापू लागल्याने तापमान 32.5 अंशावर होते. उन्हाचा झळा वाढल्याने अवघे जनजीवन होरपळू लागले आहे. उकाडा व घामाच्या धारा वाहू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे तापमानाचा पारा काहीसा उतरुन 38 अंशापर्यंत स्थिरावला होता. त्यामुळे अवकाळी नंतरचे दोन-तीन दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या दोनच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा उकाडा वाढला आहे. सकाळी हवेत गारवा जाणवत असला तरी भर दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत.
त्यातच वादळी पावसात नुकसानग्रस्त वीजवाहक तारा खांब दुरुस्तीचे कामही सुरु आहे. त्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने उकाड्याचा त्रास आणखीच वाढत आहे. उकाडा सुसह्य होण्यासाठी सरबत, थंड पेय, ताक, लस्सी पिण्याकडे नागरिकांचा कल राहत आहे.