सातारा : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा पारा फटका जिल्हावासीयांनाही बसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात उच्चांकी तापमानाचा पारा स्थिरावला होता. सोमवारीदेखील साताऱ्याचे तापमान 41.2 अंश नोंदवण्यात आल्याने नागरिक उष्णतेच्या झळा अनुभवत आहेत. महाबळेश्वरही तापल्याने 32.5 अंशांची नोंद झाली आहे. सूर्य आग ओकू लागल्याने अवघे जनजीवन होरपळले आहे.
वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघात व डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घ्यावी. तसेच अचानक थकवा, उलटी, मळमळ, डोकेदुखी अशा लक्षणांवर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, तापमान वाढीचा सर्वात जास्त त्रास व्याधीग्रस्त व ज्येष्ठांना उद्भवत आहे. उकाड्याने जीव कासावीस होत आहे. दुपारी घामाच्या धारा वाहत असून वाढत्या उष्म्याने अंगाची काहिली होत आहे. सकाळपासूनच उन्हामुळे तगमग वाढत असून भर दुपारी उन्हामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. सायंकाळीदेखील घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. दरम्यान, तापमान वाढीतही वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून इलेक्ट्रॉनिक्सची यंत्रणा ठप्प होत असल्याने नागरिक हवालदिल होत आहेत.
माणमध्ये पुन्हा उष्माघाताचा बळी
माण तालुक्यातल विरळी येथील कापूसवाडीच्या रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत सदस्या मायाक्का बापू मारकड (वय 57) यांचा गुरुवार, दि. 23 रोजी उष्माघाताने मृत्यू झाला. आठवडाभरातील उष्माघाताचा हा दुसरा बळी ठरला आहे. वरकुटे-मलवडी येथील हनुमंत काशिनाथ चव्हाण (77) यांचाही गुरुवार, दि. 16 रोजी उष्माघाताने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक मृत्यू झाला आहे. मायाक्का मारकड यांनी भर उन्हात लहान-मोठी कामे केली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घसा कोरडा पडला अन् चक्कर येऊ लागली. दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे मानले जात आहे. माण तालुक्यात सध्या सरासरी 40 ते 42 अंश तापमान नोंदवले जात आहे.