सातारा : पुणे येथे खा. राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि युवतींनी अनेक समस्या मांडल्या. यामध्ये मेढा येथील शरयू चोपडे हिने पेपरलीक प्रकरणातील संशयित गुजरातला पळून गेल्याचे सांगितले. यावर सरकार व अधिकार्यांकडून कोणतीच कार्यवाही केली नसल्याची खंत मांडली.
पुणे येथे खा. राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि युवतींनी त्यांच्या अनेक समस्या मांडल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यंदा २२ मार्च रोजी औषध निरीक्षक (गट-ब, अन्न आणि औषध प्रशासन) पदासाठी परीक्षा घेतली. मात्र, परीक्षेचा पेपर परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २० मार्च रोजी लीक झाला होता.
याबाबत विद्यार्थ्यांनी आरोप केल्यानंतर एमपीएससी ने पेपर लीक झाल्याचा इन्कार केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी शिवाय त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि इतर काही मंडळींची भेट घेतल्यानंतर एमपीएससीने पेपर लीकबाबत भूमिका घेतली. हे प्रकरण आता सीआयडीकडे आहे, अशी माहिती या प्रकरणी राहुल गांधी यांच्याकडे तक्रार करणाऱ्या शरयू चोपडे या युवतीने जाहीर व्यासपीठावर दिली. एमपीएससी पेपरलीक प्रकरणातील संशयित गुजरातमध्ये फरार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती शरयूने राहुल गांधी यांना सांगितल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
'मनाने पूर्णपणे तुटले होते'
पेपर फुटल्याचे समजल्यावर काय भावना होत्या, या राहुल गांधींच्या प्रश्नावर शरयू म्हणाली, ही बातमी कळल्यानंतर मी मनाने पूर्णपणे तुटले होते. एक मुलगी म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आमच्यावर समाज आणि कुटुंबाचा मोठा दबाव असतो, लग्नाचे टेन्शन असते. अशा परिस्थितीत असे प्रकार घडल्यास आम्ही काय करायचे? रात्रंदिवस अभ्यास करूनही असे होणार असेल, तर तयारी कशी करायची? या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सध्या गुजरातमध्ये फरार आहे. तसेच, एका नायब तहसीलदाराची दोन्ही अपत्ये (मुलगा आणि मुलगी) गुणवत्ता यादीत आली असून त्यांचे पूर्वीच्या परीक्षांमधील गुण पाहिल्यास या प्रकरणातील संशय बळावतो, तरीही आयोग या बाबी मान्य करत नसल्याचा आरोपही शरयूने केला.