रेठरे बुद्रुक : शेणोली स्टेशन ते जुळेवाडी महामार्गाकडेला असलेले विद्युत खांब वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. सहा महिन्यांपूर्वी उभा केलेले खांब कोसळल्याने नव्याने केलेल्या कामाची पोल खोल झाली आहे.
शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाच्या सरी व वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे तीन ते चार विद्युत पुरवठा करणारे खांब अचानक रस्त्यावर कोसळले. यावेळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सुदैवाने याचा कोणताही धोका झाला नाही. परंतु सहा महिन्यापूर्वीच रस्त्याचे काम करत असताना उभा केलेले विद्युत खांब पडल्याने या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वास्तविक कराड ते सांगली जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी सुरू असते. विद्युत खांब कोसळले असतानाच दुचाकी व चारचाकी गाड्या तेथून गेल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच ते बचावले. एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर याला जबाबदार कोण? असाही संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.