कराड; पुढारी वृत्तसेवा : कराडमधील दत्त चौक (शिवतीर्थ) परिसरात तालुक्यातील मराठा समाजाकडून एक तासाहून अधिक काळ निदर्शने करत राज्य शासनासह जालना पोलिसांचा निषेध नोंदवला.
त्याचवेळी राज्य शासन व जालना पोलिसांच्या निषेधार्थ बंद पाळण्याचे आवाहनही करण्यात आले. जालन्यातील दोषी पोलीस उपअधीक्षक तसेच दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आले. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी करत तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले.
एक मराठा लाख मराठा, जालना पोलिसांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत राज्य शासनासह जालना पोलिसांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर दत्त चौक व तहसील कार्यालय परिसरात रास्ता रोको करत राज्य शासनाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 15 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला. 15 सप्टेंबरनंतर मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा सज्जड इशाराही मराठा समाज बांधवांनी दिला आहे.